रामू --एक मुंगुस
------------------------------ --------------
काही आठवणीची मनात अशी साठवण होते कि त्या संपता संपत नाही .अशीच एक आठवण माझ्या मनाला चटका लावून गेली . हि गोष्ट मी साधारण १२ वर्षाची असेल तेंव्हाची आहे. मी इयत्ता पाचवीत शिकत होते.माझे सातवीपर्यंत चे शिक्षण आमच्या छोट्या गावात झालेले आहे . मला लहानपणापासूनच पाळीव प्राण्यांचा
फार लळा आहे . त्यावेळी आमच्याकडे ४ कुत्रे होते . आमचा शेतमळा शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यात होता .जाताना आणि येताना मी तिथे जात असे .काही मित्र मैत्रिणींसोबत तिथे खेळत असे ..कुत्र्यांची राजा ,प्रधान ,टीलु ,आणि टोप्या अशी नावे होती .
आमच्याकडे आमच्या शेतात काम करणारी पाच सहा कुटुंबे त्याच मळ्यात राहत होती .तशी राहण्याची व्यवस्था जमीनदार ने करायची असते .हि पद्धत तेंव्हाही होती .त्यात एक कुटुंब होते महादू भिल्ल याचे .त्याने माझी प्राण्याची आवड पाहून,मला पोपट पाळायला आणून दिला .जेमतेम १५ दिवस पोपट राहिला .एक दिवस मांजरीने त्यावर डल्ला मारलाच .त्यावेळी खूप वाईट वाटले होते .त्यानंतर बरेच दिवस मी शेतमळ्यात गेले नाही .
एक दिवस महादेव माझ्यासाठी घरी एक मुंगुस घेऊन आला माडीवरील एका रुममध्ये लोखंडी पलंगाला त्याला बांधून ठेवण्यात आले होते .मुंगुस पाळणे हे माझ्यासाठी नवीनच होते.आमच्या घरगड्याने त्याचे नाव रामू ठेवले होते .सुरवातीला दोन दिवस हा पाहुणा बुजल्यासारखा राहिला .मग त्याची आणि माझी चांगली गट्टी जमली .
मी शाळेतून आली कि दफ्तर फेकून प्रथम त्याच्यासोबत खेळत बसायची अर्थात आईच्या रागवाण्याकडे दुर्लक्ष करूनच .माझा छोटा भाऊ रामूची खोडी करायचा .मी त्याला खूप जपत असे.मुरमुरे ,फुटाणे ,भिजलेली डाळ आई खायला देत असे महादू त्याच्यासठी कागदात बांधून काहीतरी घेऊन यायचा रामू ते सर्व फस्त करायचा . २महिने उलटले असतील रामू आमच्या घरी चांगलाच रुळला होता.
एक दिवस आमच्या गावाच्या तालुक्याच्या ठिकाणी सर्कस आली होती .त्यावेळी मनोरंजनाची साधने हीच होती .जादूचे खेळ ,डोंबऱ्याचे खेळ गावात कुस्ती कबड्डीचे सामने होत असत .आत्ता सर्व इतिहास जमा झाले आहे .आम्ही सर्कस पाहायला गेलो आणि त्या सर्कस मधील वन्यप्राण्यांचे हाल बघून मला जाणीव झाली कि हया जीवांना असे बांधून ठेवणे योग्य नाही .मी घरी येताच ठरवले कि , मी रामूला शेतात सोडून देणार . तसे आईला बोलून दाखवले ,पण आईने सांगीतले कि तुझा छोटा भाऊ रडेल त्याच्या नकळत आपण त्याला सोडून येऊ .माझी आई माझ्या सोबत होती फक्त मी एका संधीची वाट पहात होते .
रामूच्या जाण्याने सर्वात जास्त त्रास मला होणार होता .मी एकटीच कोपऱ्यात बसून रडत बसायची .माझी ताई लग्न होऊन सासरी गेली होती तेंव्हा जसे दु ख झाले होते अगदी तसेच दु ख होत होते .एके दिवशी मी त्याला कपड्यात गुंडाळून मळ्यात घेऊन गेले .आणि तिथे सोडून दिले .माझी आठवण म्हणून त्याच्या गळ्यात एक रंगीत दोरी मी बांधली होती.माझ्या हातून सुटका होताच रामूने धूम ठोकली ,पण धावताना मागे वळून पाहण्यास तो विसरला नाही .जसे तो आभार मानत असावा .घरी रामू हरवला म्हणून सांगून टाकले .परंतु आईला सत्य माहित होते .पुढे एक दीड महिन्यानंतर मी यथावकाश शाळेत गुंतून गेले .
आमच्या मळ्यात काही बोरांची झाडे होती .आणि हिवाळ्यात बोरांचा सिझन असल्याने ,आम्ही शाळेत जाता येता बोरे गोळा करण्यास धावत जायचो .एकदिवशी असेच माझी एक मैत्रीण आणि मी बोरे घेण्यास मळ्यात गेलो .खाली बोरांचा सडा पडलेला होता ,मैत्रीण दोन्ही हाताने बोरे गोळा करू लागली ,मी एका हाताने गोळा करत होती ,कारण एका हातात पुस्तक होते .ती जास्त बोरे घेईल आणि मला कमी मिळतील या चढाओढीत मी पुस्तक खाली ठेवायला वळले तर ,तेवढ्यात मैत्रीण ओरडली मनिषा साप साप .....तुझ्या पायाजवळ बघ ..... माझ्या पायाजवळ एक नाग फना काढून उभा होता,नागाच्या फण्यावर मी पुस्तक ठेवणार होते , .पुस्तकात आणि नागाच्या डोक्यात दोन बोटाचे अंतर होते .मला तिथून पळून जायचे हि सुचत नव्हते .मी जोरजोरात ओरडत होते आणि भीतीने थरथर कापत होते ,पण सुदैवाने सापाचे तोंड माझ्याकडे नव्हते .तो समोर बघत होता .समोर गवतात काहीतरी पुढे आले .मी जोरत ओरडली रामू ...हो रामूच होता तो ,तो रंगीत धागा तसाच त्याच्या गळ्यात होता .त्याचे लक्ष सापाकडे होते .माझ्या मैत्रिणीने मला हाताला धरून खेचले आणि आम्ही दोघींनी धूम ठोकली थेट शाळेत आल्यावरच थांबलोत.मैत्रीण बोलली तुझे आज रामू मूळेच प्राण वाचले .साप आणि तुझ्यात काहीच अंतर नव्हते .पण रामू तिथे कुठून आला काय माहित ? रामू आणि साप एकमेकांकडे बघत होती ,म्हणून तू वाचली.
दुसऱ्या दिवशी घरगड्याने आईला सांगतले कि ,बोरीखाली रामू आणि साप दोघेही रक्त बंबाळ होऊन मरून पडले होते .आई ने कितीतरी वेळा रामूचे आभार मानले असतील . तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोरून हलत नाही .रामूने उपकाराची परतफेड अशी केली होती .
------मनिषा बांगर -बेळगे
१८/८/२०१२