रविवार, १४ मे, २०१७

कवडसा

"कवडसा "
वैशाखातले उन्ह रणरण करत होते . यंदाचा उन्हाळा कडक आहे .असं काल गावात  कुणीतरी बोलत  होतं .ऊन असो नाहीतर थंडी जगावं तर लागणारच होतं.अजून केस चा निकाल बाकी होता.  मला कलंक घेऊन मरायचे नव्हतेच .मी ठरवलं होतं , एकदाचा  निकाल लागला कि मी जीव दयाला मोकळी .तेवढ्यात माझं लक्ष वाऱ्याबरोबर हलणाऱ्या  ,हिरव्या कंच मकाकडे गेलं.नुकतीच  मकाला कणसे यायला लागली होती .आता पाणी मिळाले नाही तर जळून जाईल .पावसाला यायला बराच अवधी बाकी  होता.
पाणी कुठून आणू.कोणाला पाणी मागू गावाने मला तसे वाळीतच टाकले होते .वरून पाटलानी .सक्त ताकीद दिली होती .गावात पाय ठेवायचा नाही .बराच वेळ विचार करून उत्तर सापडेना  डोके भनभन करू  लागले होते  .चहाची तल्लफ झाली होती ,चहा करावा  म्हणून खोपटा कडे वळले .आत्ता हेच माझं घर आणि संसार ,दोन चार फुटकी भांडी ,एक पत्र्याची पेटी ,दोन लुग्ड्याचे जोड आणि गुंठाभर जमिनीचा तुकडा , एकता जीव सदाशिव . खोपटाच्या बाहेरच तीन दगडाची चूल मांडली होती .चुलीत काटक्या टाकल्या .आग पेटायला आग पेटी खोलली.त्यातही दोनच काड्या शिल्लक होत्या .चूल तशी पेटलीच नसती म्हणून पालापाचोळा गोळा करून आणला चुलीत टाकला ,काडी लावली .धड धड करत चूल पेटली .पाण्याच आधन ठेवलं.बुक्नी आणि साखर आणायला गेले .तोवर वाऱ्याने आपले काम केलेच पेटलेला  पाचोळा उडत घेऊन .शेजारच्या माळरानात  घेऊन गेला ,माळरान पेटलं  .मला वाटलं ,वाऱ्याने विझून जाईल .तसं झालंच नाही .
  उभं माळरान पेटलं तेंव्हा आग इतकी भडकेन  असं वाटलं नव्हतं .आग  थोडी होती,तेव्हा तिलाच न्याहाळत  बसले.एका एका काडीला कशी पोटात घेते आणि उरते फक्त  राख .
राख ही बराचवेळ शिलगत ठेवते गवताच्या काडीला .माझं ही  असंच  होतं बऱ्याचदा एक अंधुकसा काजवा चमकतो आणि डोळ्यावर लख्ख प्रकाश टाकून पळून जातो .कितीतरी वेळ डोळे उघडे आहेत का मिटलेले,अंधार आहे उजेड  कळतच नाही ,   हळू हळू  शिलगत जातो उजेडं आणि दिसेनासा होतो .
 जसं जसं शिवार पेटलं .तसा जीव कासावीस झाला . मनात आगीचा डोंब उसळला .आग विझवू कशी .पाण्याचा पत्ता नाही .एकटी एवढी आग ?   आधीच काहीतरी करायला पाहिजे होतं .हतबल झाले .आग  विझवायला माझ्याकडे फक्त दोन हात होते .आग विझवणे म्हणजे स्वतः ला पोळून घेणे होते .मी नाही विझवली आग .बघत राहिले उघड्या डोळ्यांनी शिवार जळताना .तसे सगळं जळून गेल्यावर, जगणं  थोडीच थांबणार होतं..कुणी मेलं...अन कुणी जळाल तरी जगणे आहेच शिल्लक ....आणि सतत शिलगत  ठेवतात ..उरलेल्या खाणा खुणा .
मदतीला  हाक मारावी .तर पलीकडच्या शेतात दोन वडाच्या झाडाशिवाय कोणीच नाही .ती  साधी सुधी झाडे नव्हतीच .जणू वाड वडील होते त्या शेत मालकाचे .त्याला त्या झाडांशी बोलताना खुपदा पाहिलंय आणि मी माळरानात राह्यला आल्या पासून या दोन झाडाचीच तर सोबत होती .मी आणि ती दोघं.मी बघत बसायचे त्यांच्याकडे .जणू माझी दुः खे त्यांना कळत होती .  माझ्या निरपराध असण्याची ती साक्षी होती .४ वर्षापूर्वी शेतातून घरी परतत असताना .धो धो पाऊस आला विजा कडकडत होत्या .मी नवऱ्याला म्हंटले पाऊस थांबे पर्यंत झाडाखाली उभे राहू .तो म्हंटला झाडावर वीज कोसळत असती .तरी मी झाडाखाली थांबले .आणि माझी पोरगी आणि नवरा माळरानावर एकाच्या जुन्या पडक्या घराच्या आडोशाला थांबले .इथच नियतीने घात केला  आणि आळ माझ्यावर आला .डोक्यात दगड घालून मी माझ्या पोटच्या गोळ्याचा खून केला .गाववाल्यांनी पोलिसात तक्रार दिली   माझी जामीनवर  सुटका झाली होती .पण तारखांना हजर राहावे लागयाचे  .हि झाडं माझी एकमेव साक्षीदार .
  आणि झाडं थोडीच आग विझवतील .ते तर अजून पेटवतील आणि स्वतः ही जळून जातील.त्यांचा मालक शोधत बसेल बिचारा .जाऊ दे जळू दे जे जळायचे ते .मी मनाला समजवले .तुझे स्वतः चे असे होत काय तिथे . एक झोपडं  ,नकोसा झालेला संसार , चार लाकडं, थोडी मका  ,थोडी गवत काडी..पोतंभर  बाजरीची वाळलेली कणसे ,आणि काळी माती ,लाल माती ,आणि सगळीच नाती गोती .जळाले सर्वच .नाते म्हंटल्यावर  भानावर आले .कोणते नाते ? आगीचे आणि माझे? कि मातीचे आणि माझे? कि गावाचे नि माझे ?
तरी ही  डोळे पाणावले .मन अधीर झाले .घसा  कोरडा पडला .घशात ओतायला ही पाणी नाही .
तेवड्यात जोरात वावटळ आली .तशी आग वाढू लागली .आसपासच्या रानातल्या गवताशी पाठशिवणीचा खेळ खेळू  लागली .पलीकडच्या रानातली तीच दोन झाडे . वावटळी बरोबर जोरजोरात हलत होती ...जणू मला मुक्यानेच सांगत होती जा पळ इथून ही आग तुझ्यापर्यंत येईल ...वाचव तुझा  देह  ...पळ पळ ...मी तशीच बसून घट्ट जमिनीत नाळ बांधल्यासारखी .मायच ती माझी .तिला सोडून कशी जाऊ?   आत्ता गरम झळया लागू लागल्या होत्या .सुssसुssसुsसुsसू आवाज करत वारा त्याचे काम चोख बजावत होता. मी पुन्हा झाडांकडे बघितले .त्यांचा आक्रोश  चालूच होता .देह ,शरीर .....ते सारखे देह का म्हणत आहेत?  आत्मा ....मन का म्हणत नाहीत? ... असं प्रश्न पडला खरा पण त्याचं उत्तर ही माझ्याचकडे होतं. एकदा दुः खात होरपळलेले  मन पुन्हा पुन्हा कसे जळेन.राख कधी जळते का?
उठून उभी राहिले. आत्ता तिने संपूर्ण माळरान आपल्या मिठीत घेतले होतं .जिथवर नजर जाईल तिथवर आग होती .काय होऊन बसले .आधीच का नाही चिरडली तिला .कशी गिळायला येते मला...गीळ ...गीळ ..संपव ...सगळंच...
अगं अक्के..अक्का ....उठ ,पळ ,भाजशील...गवत वाळलेले आहे ..आग शिलगत चाललीय . कुठूनसा   आवाज आला . मागे वळून पाहले...हनुमंत  ...धावत होता...अक्के कसे  पेटले ग शिवार .... हा ...हनम्या .माझा मानलेला भाऊ ..किंवा मी त्याची मानलेली बहिण ...एकचं नातं...भाऊ बहिणीचं...नाहीतर बहिण भावाचं...काय फरक पडतो ..
       मी त्याच्याकडे बघितलं. कष्टाने रापलेल्या कपाळावर धावत पळत आल्यामुळे  घाम जमा झाला होता .घाम म्हणजे पाणी आणि रक्त , माझ्या डोळ्यात चमक आली . आशा पल्लवीत झाल्या .घामाने विझेल का आग? काहीतरी विचित्र विचार मनात डोकावला .तो मात्र " अक्के ..अक्के ..मला ....गदागदा हलवून विचारत होता ..आग कशी लागली? ..कशी लागली? ...सांग ना...   जे झाले ते झाले ..ही आग आपल्या आटोक्याच्या बाहेरची आहे .तू विचार कसला करतेय ,चल गावात ." मी म्हंटले ,"हनम्या जा तू मी नाही येणार "
मी नाही येणार म्हणजे?  तुला काय वेड लागलेय .हन्म्याने मला हाताला धरून रानातून बाहेर आणले .मी सोड सोड म्हणत असताना तो तसाच फरपटत नेत होता .
समोरून आत्ता अर्धा  गाव पळत येत होता ...क्षणभर घाबरले ..उलट्या दिशेने पळाले ...मनात शंकेची पाल चुकचुकली ..ही गावातली माणसे मला उचलून आगीत तर नाही  टाकणार? पण मी आगीकडे  पळतेय .मला भीती कशी नाही  वाटत  तिची .त्यापेक्षा गावातल्या माणसांची भीती  वाटत होती  . हनम्या माझ्या मागून धावत होता .ते पाहुन मी ही थांबले .तोपर्यंत सावित्रीकाकू माझ्यापर्यंत आल्याच .माझ्याकडे तिरका कटाक्ष टाकून हन्म्यला म्हणाल्या ...तुला म्हंटले नव्हते ...ही पांढऱ्या पायाची अवदसा अशी सगळ्या गावाला आग लावणार ...आधी  आई बाप ..लग्न झाल्यावर ..नवरा आणि मुलीला खाल्ले ...आत्ता गावावर नजर आहे .कशाला वाचवतो तिला .ही मेलेलीच बरी .सावित्री काकू चे बोलणे आगीपेक्षा जास्त पोळत होते . माझे म्हणावे असे या गावात हनम्या सोडून कोणीच नव्हते .जे होते ते देवाघरी होते. आणि त्यांच्या देवाघरी जाण्याला गाव मला जबाबदार धरत होते हन्म्याने काकूला गप्प राहायची खूण केली .तरी ती तोंड सुख घेत होती .मी गप्पच ....चार दोन माणसे बोलली ...जे जळायचे ते जळू द्यावा ..आता ही आग कोण नाही विझवू शकत
अरे देवा .. ...माझं शेत पण जळाले ...आणि झाडं ..पाऊणशे वर्षापूर्वीची झाडं ..पण  आत्ता जाळली या बयेने ...त्या झाडांचा मालक माझ्यावर दात ओठ खात होता ...डोक्याच्यावर ज्वाळा उसळत असल्यामुळे पलीकडचे शेत दिसत नव्हते .जास्त आग भडकत चाललेली पाहून ..बरीचशी मंडळी मागे फिरली ......अचानक  जोरात वारा सुटला ...भर दुपारी सूर्य ढगाआड गेला .....काळे काळे ढग आकाशात सैरावैरा पळू लागले ...मी आकाशाकडे बघितले ....आत्ता कुठल्याही क्षणी चार दोन थेंब पडतील असे वाटू लागले होते ...मला एक कवडसा सापडला ...माझे डोळे आभाळावर खिळले होते ...आग माझ्याकडे धाव घेत होती ...पाऊस कि आग ..यात मी उभी होते ...जे मिळेल ते आत्ता  मनाची तयारी झाली होती ...हनम्या अजून तिथेच उभा होता ...जा हनम्या जा ...माझी शप्पथ आहे तुला ...मी येते ...तुझ्यामागे ..त्याने तिथून जावे म्हणून मी खोटे बोलत होते ...हन्म्याने माझी  आशा सोडली ....खिन्न मनाने चालू लागला .....तेवढ्यात  तो ओरडला अक्के पाऊस आला  ग ...हे बघ माझ्या कपाळावर  एक थेंब पडला .....मी लगेच म्हंटले विझवून टाक...ही आग तुझ्या घामाने ...तुझ्या घामानेच  विझेल.....तेवढ्यात माझ्या पदराने पेट घेतला ...हनम्या ओरडत होता अक्के पदर पेट्ला...मी तशीच उभी ...हन्म्या ओंजळीने  माती उचलून पेटत्या पदरावर टाकत होता...मी चमकून त्याच्याकडे पहिला ..मातीनं आग विझली असती ..तर पाण्याची काय गरज होती ...त्याच्या पोरखेळ ...बघत  ..मी आभाळाकडे हात पसरवून उभी होते ...डोळे मिटवून पावसाला जणू आवाहन करत होते ... ..पाऊस मात्र थेंबाचा खेळ खेळत होता ..एक थेंब हातावर ... एक थेंब डोळ्यावर ...एक थेंब गालावर ..एक थेंब ओठावर ....एका थेंबाने माझा गळा ओला होणार नव्हता...पण आशेचा किरण दिसला होता ....अजूनही पदर पेटतच  होता ...आत्ता मी पदर एका  हातात धरला ....दुसऱ्या हाताने विझवत होते ..अगदी शांत पणे..हात पोळत होते ..पण मला वेदना होत नव्हती ...एव्हाना पावसाने कोसळायला सुरवात केली होती  .....मी हाताकडे बघितले शेवटी ते पोळून काळे झालेच होते .....ते आधीच झाले असते  तर ...पण मला  जगण्याचा कवडसा नसता भेटला ....आग शांत झाल्यावर ...पलीकडल्या शेतातल्या झाडाची आठवण झाली ...ती दोन झाडे ...तशीच उभी होती ...आनंदात पानें हलवत होती ..जणू मला वाचवले यासाठी ...कि देह वाचवला यासाठी .....नाही... देहासोबत मनही आज वाचले होते ....तेच .....मला आत्ता  कळले होते ..निकाल काही लागू देत   ..आत्ता  मी जगणार होते ....देव जगवेल तेवढं.

लेखिका --मनिषा बांगर -बेळगे ,
  दुबई 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: