मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

सोपानदादा


 ---------रम्या कचऱ्याच्या गाडीची वाट बघत होता .चार दिवसापासून समता नगर मध्ये कचरा गाडी आलीच नव्हती .रम्या ८ वर्षाचा चुणचुणीत मुलगा  त्याचे आईवडील या जगात नव्हते .२ वर्षापूर्वी फुटपाथवर झोपलेले असताना अंगावर गाडी गेल्याने जागीच चेंदामेंदा झाले होते .त्या अपघातात तो कसा वाचला त्यालाच आठवत नव्हते . रम्या चार दिवसापासून उपाशीच होता. कचऱ्याच्या गाडीवरील ड्रायव्हर सोपानदादा रोज रम्यासाठी भाकरी घेऊन येत असे . कधी दादाची ड्यूटी बदलली तरी गाडी तीच होती गाडीसोबत भाकरी येत असे. भुकेने व्याकूळ झालेल्या रम्याने समोरच्या टपरीवाल्याकडे चहा आणि बिस्कीट मागितले ,बदल्यात भांडे धुवून देतो कबूल केले.पण टपरीवाल्याने त्याला हाकलून लावले .बेवारस कुत्रे रम्याच्या पायात घुटमळत  होते.कुत्र्याची आणि रम्याची अवस्था सारखीच होती म्हणून बहुदा त्या दोघांमध्ये गाढ मैत्री होती.२ वर्षापासून रम्या आणि कुत्रा एकमेकांची सोबत करत होते .रम्याच्या पायाला पोलिओ झाल्यामुळे त्याला कोणी काम देत नसे.  सोपानदादा या आठवड्यात काम मिळवून देणार होता.आत्ता काम हि नाही आणि भाकरी नाही.खूप ठिकाणी भटकून पदरी निराशाच आली.रात्र बरीच झाली होती.कुत्रं अजूनही रम्यासोबतच होतं. या दोघांमध्ये मूक संवाद चालत असे दोघांनाही एकमेकांची मने कळत होती रम्या  झोपडीकडे चालला होता  म्हणून कुत्रं  जोरजोरात विव्हळत होतं. रम्याने त्याला पायाने दूर झिडकारले ....आणि म्हंटला  ..खां..खा मला ..खातूस का? आरं तू काही खाऊन पोट भरशील ...ते म्या नाही खाऊ शकत. अचानक ओरडल्याने कुत्र केकटत पळाले.रम्या जवळच्या एका बस थांब्याच्या आत जाऊन पाय पोटात घेऊन मुटकुळं करून बसला.वर्षभरापूर्वी याचं ठिकाणी आपण भिक मागत असू ...याची त्याला आठवण झाली .दिवसभर भिक मागून बऱ्यापैकी पैसे मिळत होते.त्याच पैशाचं खायला आणून कुत्रं आणि तो आनंदात  जगत होते. पण एक दिवस सोपानदादा आला अन सगळच बदललं.एक कचऱ्याच्या गाडी वरच्या ड्रायव्हरने ,रम्याला माया ,ममता दिली.आपले माणूस काय असते ह्याची जाणीव त्या कोवळ्या मनाला झाली होती.त्याच्या दादावर अतोनात जीव जडला होता. भिक मागायची नाही आणि चोरी करायची नाही या दोन गोष्टी रम्याने चांगल्या आत्मसात केल्या होत्या .जो पर्यंत काम मिळत नाही त्याच्यासाठी भाकरी देण्याची हमी दादाने घेतली होती .तेंव्हापासून आत्तापर्यंत नित्यनेमाने आपणास भाकरी मिळत असे.आज चार दिवस झाले दादा इकडे फिरकले नाहीत.रम्याला आता सगळं असह्य झाले होते. तेवढ्यात कुणीतरी सदरा खेचत होतं.रम्याने मागे वळून पहिले .त्याचा दोस्त कुत्रा त्याला बस थांब्याच्या बाहेर खेचत होतं .रम्या बाहेर आला ,तर त्याला एक म्हातारी तिथं उभी दिसली,तिच्या हातात एक गाठोड होतं.तिने रम्या तूच का म्हणून विचारले रम्याने होकारार्थी मान हलवली."आरं पोरा म्या तुझ्या दादाची आई हाये ... हे कुत्रं तुझं हायी का ?म्या मागच्या गल्लीत आवाज देत व्हती तेच इथं मला घेऊन आलं"."लई हुशार हायी.मी चार दिसापासून तुला भाकरी द्यायला रोज येती ,पर तू गावला नाहीस ..आज गावलास..आत्ता म्याच भाकरी घेऊन यैल..."पर दादा कुटं हायती" ..इति रम्या म्ह्तारीने खोल श्वास घेतला ,गाठोडं रम्याच्या हातात देत बोलली ,"बदली झाली नव्हं का ?रम्याला भाकरी पेक्षा दादाची उत्कंठा लागली होती.बदली म्हणजी काय ?रम्याला म्हातारी काही लपवतेय असे वाटले .म्हातारीने समजावले दादा दुसऱ्या शहरात गेला. कधी येणार हा प्रश्न आलाच.म्हातारीने त्याला आधी भाकरी खाण्यास सांगितले .तसा रम्याने गाठोडं उघडून..आधी कुत्र्या पुढे तुकडा टाकला.म्हातारी या दोन जिवाकडे  बघत बसली .{चार दिवसापूर्वी पेपरात बातमी होती ,कचऱ्याच्या गाडीला भीषण अपघात ,ड्रायव्हर जागीचं ठार ......}  ------मनिषा बेळगे     
   दुबई                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: