मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

तर आठवते का गाणे "पान खायो सैया हमार" ...अशा ह्या पानाची गोष्ट घेऊन आल्या आहेत मनीषा बेळगे .... "खाईन तुपाशी" मध्ये

प्रिय आई,

साष्टांग प्रणाम माझ्या घरी गणरायाचे आगमन झालेले आहे, त्यामुळे खूप व्यस्त आहे. गणपतीची आरास, आरती ,प्रसाद एवढ्या धांदलीत मी तुला पत्र लिहितेय. गणेश मूर्ती ची स्थापना करण्यासाठी खाण्याचे पान आणि सुपारीची आवश्यकता असते. तसे दुबई मध्ये हि गोष्ट अतिशय दुर्लभ आहे. कारण इथे कायद्याने गुटखा,पान,तंबाखू, खसखस यांना बंदी आहे. या गोष्टी आपणाकडे आढळून आल्यास चांगलाच दंड आहे, जेल हि होऊ शकते. तरीही काही बहादूर विक्रेते या गोष्टी लपून छपून विकतात. पानाची टपरी वगैरे तुला दिसणार नाही. सिगरेट मात्र राजरोसपणे विकली जाते कारण सिगरेट स्टेटसचा एक भाग आहे आणि पान खाणे म्हणजे निव्वळ देहातीपणा एकूण पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्याचे दर्शन इथे होत नाही.

तर हे खाऊचे पान पूजेसाठी मी मिळवलेच. या पानाविषयी माझी उत्सुकता फारच वाढली म्हणून थोडी फार माहिती मी मिळवली. संस्कृत मध्ये पानाला ताम्बूल आणि गुजराती मध्ये नागुरवेल म्हणतात,तर आपण याला विड्याची पाने म्हणतो. असे म्हणतात १०० पाने १ किलो तुपाच्या ताकदीची असतात, आता खरे खोटे देवाला माहित, कारण ती देवाला पूजेत लागतात.

भारतात सर्वच राज्यात पान आणि सुपाऱ्या देवकार्यासाठी जातात.सांगायचा मुद्दा असा कि आपल्याकडे या पानाशिवाय कुठलेही धार्मिक कार्य तसेच लग्न,मुंज वैगरे पार पडत नाही. तर ह्या पानाचा शोध प्रथम एका बेटावर लागला, पुढे मुगल सल्तनत मध्ये फार लोकप्रिय झाले.पानाचा महिमा सिनेमापासून तर मुजरा ऐकणाऱ्या पर्यंत सर्वांनाच माहित आहे. ह्या पान प्रेमातून कोणी सुटले नाही. पानाची काही प्रसिद्ध नावे, काही गाणी, मुजरे, एवढेच नाही तर ओव्या, अभंग तसेच श्लोक हि लिहिल्या गेलेत. मध्यंतरी गुटख्याचे आगमन झाल्यावर या पानाच्या विक्रीवर परिणाम झाला खरा, पण पानाचे स्थान अढळ राहिले.

मी तुला पानाचे गुण सांगतेय याचा अर्थ असा मुळीच नाही कि तू किंवा कोणी पान खाण्यास सुरुवात करावी. पान तसे वाईट नाही गुटखा, तंबाखू आणि सिगारेट पेक्षा ठीकच आहे. तसा पानाचा विडा मुखशुद्धी आहे खरा पण दाताच्या शुभ्रतेची पार वाट लागते.पानातील औषधी गुणधर्मामुळे सर्दी पडसे, डोकेदुखीलाही आराम मिळतो.

पान लावण्याच्या लकबीवरून वर्षानुवर्षे पान खाणाऱ्या एका बाई ने चोराला पकडले होते.त्याचे असे झाले, एक चोर स्री वेषभूषा करून रोज संध्याकाळी गप्पा मारत पान खात बसलेल्या स्रिया मध्ये जाऊन बसत असे. त्याला सोने नाणे मालमत्ते बद्दल माहिती काढायची असावी.थोडक्यात रेकी करण्यास येत असावा.एक दिवस पानाला चुना लावण्यासाठी त्याने चुना मागितला,आणि त्याने चुना अंगठ्याने काढल्यावर लगेच त्याला हटकले असता.पळण्याचा प्रयत्नात असताना सर्वांनी पकडला.त्या बाईंच्या मते डब्बीतून चुना काढताना पुरुष अंगठ्याचा वापर करतात आणि स्रिया बोटाचा.चला निरीक्षणाचा असाही फायदा झाला.

मागे भारत बांगलादेश युद्धात बांगलादेशने जेंव्हा भारतापुढे शरणागती स्वीकारली तेंव्हा बांगलादेशाच्या जनरलच्या विरोधात रहमान आयोगाने आरोप लावला कि "जनरल नियाजी कि पान बनाने मे ही अधिकतम उर्जा खर्च होती है|" तर असा हा पानाचा महिमा संपणार नाहीच.पुन्हा लिहीनच तूर्तास थांबते

तुझी लाडकी लेक मनिषा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: