मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

पहिल्यांदाच मला बुद्धी प्रामाण्य पत्र हाताशी लागले आहे … मनीषा तुझे खूप आभार.हल्ली असे कुणी लिहित नाही - लोकांना आवडेल का? रुचेल का? असे लोकानुनय करणारे प्रश्न मनात उभे राहतात. मळलेली पायवाट सोडून नवीन पायवाट रुजवायचा हा प्रयत्न … खूप वाचा

नमस्ते ,सदरील लिखाण माझ्या मनावरील कोरीव शिल्प आहे .सत्य् घटनेवर आधारित आहे.

प्रिय ,

सदसदविवेकबुद्धी
खूप दिवसाचे तुझ्याविषयी लिहीन म्हणतेय ,सारखे आज उद्या करत होते. आजकाल तू कुठे दिसत नाही .
या भूतलावरून अगदीच गायब होण्या आधी तुझ्याविषयी दोन शब्द लिहीन म्हणतेय तुझी ओळख झाली तेंव्हा मी साधारण १० वर्षाची होते.इयत्ता ४ थी त शिकत असेन ,बालभारती मध्ये एक धडा होता "सद्सद्विवेकबुद्धी" या धड्याचा लेखक मात्र आठवत नाही. हा शब्द पहिल्यांदा उच्चारला आणि खूपच आवडून गेला.१० वेळा न बघता लिहून काढला. भारीच वाटला . त्याचा अर्थ धड्याच्या खाली शब्दार्थ मध्ये दिला होता खरा
पण मला काही रुचला नाही .किंवा समजला नाही. म्हंटले अजून एखाद्या मास्तराना विचारावे. साधारण हि सद्सद्विवेकबुद्धी कशाशी खातात.त्यांनी हि थातूर मातुर सांगून बोळवण केली.
आईने म्हंटले मोठी झालीस कि समजेल. वडिलांनी हि त्यांच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
वडिलांनी थेट महाभारतातील उदाहरण दिले " अश्व्थाम्याच्या मृत्युच्या बातमीने द्रोणाचार्य साशंक झाले खरे ,पण सत्यवचनी युधिष्ठर ने अश्वत्थामा (हत्ती )मेला अशी ग्वाही दिल्यानंतर त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सुप्त झाली , आणि ते पुत्र वियोगात शोकाकुल झाले.
त्यावेळी महाभारत समजण्याइतपत वय नव्हते .कृष्ण एकमेव पात्र माहित होते .
एका मैत्रिणीने ती अक्कलदाढ असावी असे सुचवले .पण मनाने ठाव घेतला तू काहीतरी खूपच अप्रतिम गोष्ट आहेस. आपल्याला जर मिळालीस तर काय होईल.
काहीही करून मिळवायचीच ,विचाराने कित्येक दिवस स्वस्थ बसू दिले नाही.
एकदिवस धीर करून वडिलांना म्हंटले ,मला आणि माझ्या भावाला खाजगी शिकवणी ची गरज आहे.
अजून कुणी जाणकार भेटेल हि माफक अपेक्षा ठेवून ठरल्याप्रमाणे एका मास्तरांकडे आम्ही शिकण्यास जाउ लागलो.
गणित,विज्ञान यातील जरा बरेचसे ज्ञान बघून मास्तर बोलले, तुला कोणता विषय अवघड जात आहे . आपण फक्त तोच घेत जाऊ ,मी तत्काळ "मराठी" असे उत्तर दिले. मला तर आयतीच संधीच मिळाली होती.तुझ्याविषयीची जिज्ञासा अस्वस्थ करत होती.
कधी एकदा विचारीन असे झाले होते. शेवटी एक दिवस मास्तरांवर प्रश्नाची सरबत्ती सुरु केली . … ती अशी …
१ )सद्सद्विवेकबुद्धी वयाच्या कितव्या वर्षी येते ?
२)अक्कलदाढेला पर्याय असते कि अक्कलदाढ येणे म्हणजेच सद्सद्विवेकबुद्धी येणे ?३ ) तिचा कुठे कुठे उपयोग होतो. ? ४ ) ती लवकर येण्यास काही उपाय आहेत का ? ५ ) ती जर आपल्यात नसेल तर काय होऊ शकते ? माझ्या बाळबोध(खत्रूड ) प्रश्नांनी मास्तर चक्रावले . उद्या सांगतो म्हणून पाठवणी केली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच वारीकाकरवी सांगावा धाढला.तुमच्या कन्येला खाजगी शिकवणीची मुळीच गरज नाही.ती जात्याच हुशार आहे. मात्र तिच्या छोट्या भावाला नियमित पाठवा.
झाले... घोडे गंगेत न्हाले काय आणि कोरडेच राहिले काय सारखेच … सगळे प्रश्न अनुत्तरीत राहिले… . कालंतराने मी विसरून गेली.
स्वतःचे विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत होण्यास बराच काळ जावा लागला . पुढे पदवीचे शिक्षण घेत असताना ,तुझी पुन्हा आठवण झाली खरी … पण माझ्या प्रश्नाची उत्तरे काळाने मला आपोआप दिली होती.
सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे कुठल्याही गोष्टीविषयी ती योग्य आहे कि अयोग्य याची असलेली जाणीव. तू शाबूत असलीस कि मनुष्य पापकर्म करत नाही .
स्वच्छेने कर्म करण्याचा अधिकार फक्त विवेकी मनुष्यास आहे ,कारण त्याच्याठायी conscious mind (सद्सद्विवेकबुद्धी) आहे.
आजच्या परिस्थितीत तुझा अभाव प्रत्येक ठिकाणी जाणवतो. ... तुझ्यात बरीचशी गुपिते सामावलेली आहेत.ती मी कायम नोट करून ठेवलीत. हाच माझा अमुल्य ठेवा आहे.
प्राचीन काळापासून सशक्त व्यक्तित्व (शील) याला अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. माणसाकडे षट संपत्ती असायला पाहिजे :
साम ( मनाचा शांतपणा आणि गंभीरपणा)
दाम (स्वयंवर नियंत्रण आणि स्वतःच्या वासनांवर नियंत्रण)
उपरती (तृप्तता)
तितिक्षा (सहनशक्ती)
श्रद्धा (विश्वास)
समाधान (संयमशीलता किंवा केंद्रित मन)
हे सहा गुण असल्याशिवाय, मनुष्य मुमुक्षु (ज्याला मोक्ष किंवा मुक्ती पाहिजे) बनू शकत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य मुमुक्षु बनत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान प्रदान केल्या जात नाही.
म्हणूनच माणसाकडे विवेक (चांगल्या आणि वाईट यामधील फरक कळण्याची समज), वैराग्य(उदासीनता), आणि षट संपत्ती हे असतील तर तो मुमुक्षु बनतो. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणाले की शील,समाधान ,संयमशीलता आणि प्रज्ञा (दैवी ज्ञान) हे मनुष्यामध्ये उपस्थित असले पाहिजे.
मनुष्य मध्ये अहिंसा,शील गुण असले पाहिजे. त्याला समाधी, ध्यान अवस्थेचा(meditation) अनुभव असायला हवा. तेव्हाच तो प्रज्ञावान म्हणजेच ज्ञान आणि सद्सद्विवेकबुद्धी या ईश्वरीय देणग्या असलेला मनुष्य बनू शकतो.
मनाची स्पष्टता नसणे आणि तणाव यामुळे अधर्म होतो . जेव्हा मन केंद्रित नसते आणि हृदयात सल असते तेव्हा अधर्म होतो.म्हणून ज्ञान आणि सद्बुद्धी हे तुम्हाला धर्माच्या मार्गाला घेऊन जातात .
तू आत्मा आणि भौतिक शरीर यांचा समन्वय साधतेस , त्यामुळेच भगवद्गीतेत म्हटले आहे ,
| नास्ती बुद्धीरयुक्तस्य नचायुक्तस्य भावना |,
| नचाभावयत: शांती: अशांतस्य कुत: सुखम् |

"जर तुमचे स्वत:चे चित्त तुमच्या आत्म्याशी स्थिर झालेले नसेल तर ना तुमच्या बुद्धीला धार येईल नां तुम्हाला भावनिक स्थैर्य आणि स्पष्टता येईल."


संपूर्णम
पुन्हा तुला लिहीनच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: