मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३


मनीषा बेळगे ह्यांचे रविवारचे पत्र म्हणजे एक अनुभव असतो...एक सफर असते....वेगळ्या विश्वाची....त्यात फक्त एक रेसिपी मिळत नाही...तर वेगळ्या दुनियेची...माणसांशी...ओळख सुद्धा होते...तर...न संपणाऱ्या रात्रीची गोष्ट....

प्रिय आई,


साष्टांग प्रणाम गणपती विसर्जन झाले कि पाऊस हि जातो असे म्हणतात त्यानुसार आता पावसाळा संपून हिवाळा सुरु होईल. स्वेटर आणि आणखी गरम कपडे कपाटाबाहेर येतील. मग गरम कपडे, गरम सूप, भाजलेली मकाची कणसे,हुरडा खाण्याचे दिवस येतील. एकूण गुलाबी थंडीचे आगमन होईल.


ह्या सगळ्या गोष्टींची खूप आठवण येते. इकडे हि कडक उन्हाळ्यानंतर गुलाबी हिवाळा सुरु होईल.इथे हिवाळ्यात हटकून थोडाफार पाऊस पडतो. इतकाच काय तो बदल बाकी कधी कधी भयंकर धुके पडते.दिवसा ढवळ्या समोरचे काही दिसत नाही आणि गाड्यांचे अपघात होतात. तसा ऋतू मध्ये सहज बदल होतो.अगदीच नकळत.


अशा या गुलाबी हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी होते. संपूर्ण हिवाळ्यात एक रात्र अशी येते ,अगदी वैऱ्याची रात्र म्हंटले तरी चालेल.संपता संपत नाही. इकडे साधारण डिसेंबर मध्ये हि रात्र येत असावी असा माझा अंदाज आहे. तशी हि वैऱ्याची रात्र मात्र ईरानी( फारसी ) लोकांमध्ये " शबे यलदा" म्हणून मोठ्या आनंदाने साजरी करतात.यलदा चा अर्थ जन्म घेणे असा होतो शब म्हणजे रात्र. "


ह्या सणासाठी ईराणी लोक आधीच जय्यत तयारीत असतात. या रात्रीच्या उत्सवासाठी सगळा परिवार एकत्र येऊन दस्तर खान सजवतो. सर्व प्रकारचे ड्राय फ्रुट्स आणि त्यापासून बनवलेले पारंपारिक पदार्थ तसेच ताजी फळे मुखत्वे टरबूज आणि डाळिंब ,अंगूर यांचा जास्त समावेश असतो. निरनिराळ्या खाद्य पदार्थ, पेय आणि टरबूज हमखास खातात. तसे तरी टरबूज खाण्यास डॉक्टर मनाई करतात पण ईराणी लोक ह्या रात्री टरबूज खाल्ल्याने पुढे थंडीचा मौसम असे पर्यंत सर्दी होत नाही असे मानतात.नौरोज इतकाच हा हि सण त्यांच्यासाठी मोठाच आहे. म्हणजे एकूण रात्रभर जागरण करून पहाटेचा सूर्य बघणे एकमेव हेतू असावा.


ह्या मोठ्या रात्रीनंतर दिवस थोडा थोडा वाढण्यास सुरवात होते म्हणून सूर्य जो कि सगळ्या सृष्टीला प्रकाशित करतो .त्याच्या स्वागतासाठी हि रात्र असावी. तसे आपणही कोजागिरी साजरी करतोच पण रात्रभर जागत नाहीत. उकळलेल्या दुधात चंद्राचे प्रतिबिंब पडले कि दुध पिऊन झोपून जातो. ईरानी (फारसी )लोकांचे तसे नाही. ही मंडळी रात्रभर जागतात, मैफिली जमतात.म्हातारी माणसे जुन्या गोष्टी सांगतात.शेर,शायर, दोहे, कविता झक्कास मैफिल जमते.जुन्या प्राचीन गोष्टी या दिवशी मुखोद्गत होत असाव्यात.


शेर वरून आठवले जुन्या काळात एक ईराणी कवी कासीम फिरदौसी याने जगातील सगळ्यात लांबलचक कविता लिहिली.त्यात ६० हजार शेर आहेत.आणि ते त्याने तब्बल त्याने ३५ वर्षे खर्चून लिहिलेत.त्या महान ग्रंथाचे नाव आहे " शाह्नामा",तसे जगात सगळ्यात मोठे आणि सर्वोत्तम खंड काव्य म्हणून महाभारतचाहि उल्लेख येतो.सांगण्याचा मुद्दा हाच कि जगात किती महान ग्रंथ घडवले गेलेत.


नाहीतर मी रेसिपी लिहितेय. तसा माझा काही महान ग्रंथ लिहिण्याचा मुळीच उद्देश नाही मी तुला पत्र लिहिण्यातच खुश आहे.या पत्रात तुला मी पर्शियन पुडिंग फिरणी ची रेसिपी सांगणार आहे. साहित्य - १ लिटर दुध, ८ टेबल स्पून साखर, २ टेबल स्पून तांदुळाचे पीठ, २ टेबल स्पून रोज वाटर, ४ चमचे पिस्ते ,इलायची पावडर . कृती - जाड बुडाच्या भांड्यात दुध उकळण्यास ठेवावे ,उकळी आल्यावर त्यात तांदुळाचे पीठ घालून सतत मिश्रण ढवळत राहावे,थोडे दाटसर वाटले कि त्यात साखर आणि रोज वाटर घालून साखर विरघळेपर्यंत हलवत राहावे.२ मिनटात फिरनी तयार वरून थोडी इलायची पावडर आणि पिस्त्याचे कप घालून थंड करण्यास ठेवावी. आणि थंडच सर्व करावी. कमी साहित्य आणि अत्यंत कमी वेळात पण स्वादिष्ट अशी फिरनी करून बघ..रेसिपी कशी वाटली कळव.

तूर्तास थांबते.

तुझी लाडकी लेक


मनिषा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: